श्री संस्थेचे कार्य : ध्येय, उद्देश आणि कार्यपद्धती
ध्येय : भक्ती आणि सेवाभावनेने प्रेरित झालेल्या श्री संस्थेचे ध्येय ‘श्रीं’च्या मंदिरापुरतेच मर्यादित नसून, समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग दर्शविणारे आहे. यातून निर्माण होणारे सेवाकार्य ‘श्रीं’च्या कृपेने पूर्णत्वाला जात आहे. * भक्तांच्या अंतःकरणात श्रद्धा, प्रेम, संयम व सत्य निष्ठा यांचा सेवाभाव तेवत ठेवून ‘श्रीं’चे तत्त्वज्ञान सर्वत्र पोहोचविणे. * विनम्रभावे केलेली सेवा हीच ‘खरी साधना’, या भावनेतून प्रत्येक गरजू, पीडित आणि दीनजनांच्या सेवेत तत्पर राहणे. * विद्यादान हेच श्रेष्ठदान, या उक्तीनुसार विद्यार्थ्यांकरिता गुणवत्तापूर्ण, संस्कारयुक्त असे सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करणे. * रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा, या उक्तीनुसार आरोग्यसेवेद्वारे सर्वसामान्य जनतेच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचे रक्षण करणे. * जात, धर्म, भाषा या कक्षेपलीकडे सर्वांना समानतेने स्वीकारणे आणि समाजामध्ये ऐक्य, प्रेम आणि बंधुभाव दृढ करणे. * निसर्गाला परमेश्वराचे रुप मानून पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे तसेच सर्वत्र स्वच्छतेचा संदेश पसरविणे. * भक्तांमध्ये आत्मनिर्भरता, प्रामाणिकता आणि परोपकार वृत्ती जागृत करून समाजसेवेला त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनवणे.
उद्देश : ‘श्रीं’च्या प्रेरणेने व कृपाशिर्वादाने स्थापन झालेली श्री संस्था ही केवळ धार्मिक केंद्र नसून श्रद्धा, सेवा, साधना आणि समर्पणाचे मूर्तिमंत रुप आहे. समाजात श्री भक्ती, आत्मशांती आणि सेवाभावनेचा प्रसार करणे हा श्री संस्थेचा मूळ उद्देश आहे. शिक्षण, आरोग्य, अन्नदान, अध्यात्मप्रसार, गरजूंना मदत करणे यांसारखी विविध लोककल्याणार्थ सेवाकार्ये निःस्वार्थ भावनेने करणेे हे श्री संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘सेवेमध्ये साधना व साधनेमध्ये ईश्वरप्राप्ती’ या विचाराने प्रेरित होऊन प्रत्येक सेवक, सेवाधारी, विश्वस्त व भक्त आपापल्या कृतीतून ‘श्री’ कार्याला वाहून घेतो. या सर्वांच्या नित्य जगण्यात श्रद्धा वाढविणे, समाजात सद्भावना निर्माण करणे आणि मानवतेच्या कल्याणासाठी अखंड कार्यरत राहणे हे देखील श्री संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
सेवेची परंपरा : श्री संस्थेच्या सेवाकार्याचा आत्मा भक्तसेवेच्या परंपरेमध्ये दिसून येतो. प्रत्येक भक्तांमध्ये ‘श्रीं’चे रूप पाहून ‘या भक्तांची सेवा म्हणजेच ‘श्रीं’ची सेवा’ हे श्री संस्थेचे मुख्य ध्येय आहे. श्री भक्तांच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्यांच्याकरिता सेवासुविधा निर्माण करणे आणि त्यांना अध्यात्ममार्गावर येण्यासाठी प्रेरीत करणे ही या सेवाभावनेमागील व्याख्या आहे. श्री संस्थेचे सेवक, सेवाधारी आणि विश्वस्त निःस्वार्थ भावनेने भक्तसेवेसाठी तत्पर असतात. दर्शनव्यवस्था, निवास, भोजनप्रसाद, आरोग्यसेवा, शिक्षणादी विभागांतून ही सेवा अखंड कार्यरत असते. या करिता, श्री संस्थेने विविध ठिकाणी सेवाकेंद्रांची स्थापना केली असून, ही सर्व केंद्रे ‘श्रीं’च्या कृपाशिर्वादाने नित्य कार्यरत आहेत. प्रत्येक सेवाकेंद्र भक्तांना आध्यात्मिक प्रेरणा देणारे आणि निःस्वार्थ सेवेचा अनुभव देणारे पवित्र स्थान आहे. या सर्वच केंद्रांतून अन्नदान, शिक्षण, आरोग्यसेवा, धार्मिक उपक्रम, धर्मप्रसार आणि समाजकल्याणाचे कार्यक्रम नियमित संपन्न होतात व ‘सेवेमध्ये साधना, साधनेत ईश्वरप्राप्ती’ ही उक्तीदेखील सार्थ करतात.
कार्यपद्धती ः श्री संस्थेची कार्यपद्धती श्रद्धा, शिस्त, सेवा आणि समर्पण या चतुःसुत्रीवर आधारीत आहे. श्री संस्थेचे प्रत्येक कार्य ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून आध्यात्मिक साधन आहे असे मानले जाते. सेवक, सेवाधारी आणि विश्वस्त असे सर्वजण समाजहितासाठीचे आपले योगदान निःस्वार्थ भावनेने देतात. श्री संस्थेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव या गुणांना सर्वोच्च स्थान आहे. प्रत्येक विभाग हा ‘श्रीं’च्या प्रेरणेने तसेच नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत आहे. नित्यनेमाच्या कार्यातही शिस्तबद्ध सेवा, भक्तांचा सन्मान आणि ‘श्रीं’चे चरणी समर्पणभाव यांचा सुंदर संगम दिसून येतो. ‘सेवा हीच साधना आणि भक्तिभाव हीच प्रेरणा’ या तत्त्वावर आधारित कार्यपद्धतीमुळे श्री संस्था आज भक्तजनांसाठी आदर्शवत श्रद्धास्थान बनलेली आहे.
ब्रीदवाक्य : श्री संस्थेचे ब्रीदवाक्य ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ आहे. हा केवळ एक शब्दसमूह नसून, ‘श्रीं’च्या करुणामय जीवनकार्याचे मर्म आहे. बृहदारण्यक उपनिषदातील हा मूळ शांतीमंत्र अन्य पुराण, वाड्मयांमध्येही आढळतो. सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी येवो आणि सर्वांना चिंतारहीत निरोगी आरोग्याची प्राप्ती होवो अशी मंगलमय कामना करणारा हा मंत्र आहे. सर्व जगताचे मंगल होवे, भले होवो असा आशावाद प्रगट करणारे वचन श्री संस्थेने ‘ब्रीदवाक्य’ म्हणून स्वीकारले आहे. मानव कल्याणार्थ सदैव तत्पर असलेल्या श्री संस्थेने हाच आशावाद सेवाकार्याच्या माध्यमातून भक्तजनांपर्यंत पोहोचविलेला आहे. येथे दर्शनार्थ आलेल्या भक्तांच्या धर्म, जात वां स्थितीची विचारणा न करता त्यांच्याविषयी आदरभाव राखून ‘भक्तांचा आनंद हेच श्री सेवेतील खरे पुण्य’ या भावनेने स्वागत केले जाते.