संस्थानचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य
स्वामी विवेकानंद यांच्या ‘शिवभावे जिवसेवा’ या बोधवचनाने प्रेरित होऊन श्री संस्थेने रूग्णसेवा हीच परमोच्च मानवसेवा हे ध्येय निश्चित केले. या सेवाकार्यांतर्गत गरजू रुग्णांना निःशुल्क औषधोपचार आणि सुसज्ज आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा श्री संस्थेचा जनहितार्थ संकल्प आहे.
या सेवाकार्याच्या माध्यमातून श्री संस्थेद्वारे सेवार्थ रुग्णालय, फिरते रूग्णालय आणि ग्रामीण आरोग्य सेवा योजना अशा तीन सेवा कार्यरत आहेत. ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती तसेच दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या माध्यमातून श्री संस्थेने ‘शिवभावे जिवसेवा’ हे बोधवचन प्रत्यक्षात साकारले आहे. सोबतच, आरोग्यसेवा देण्याकरीता भव्य सुसज्ज व अत्याधुनिक रुग्णालय उभारणे, जिथे वैद्यकीय सेवा पोहोचू शकत नाही अशा दुर्गम भागात फिरते रूग्णालय पाठविणे आणि बुलढाणा जिल्ह्यातील गरजू रुग्णांना ऑपरेशनकरिता आर्थिक साहाय्य करणे हा श्री संस्थेच्या वैद्यकीय सेवाकार्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
रुग्णालय
खामगाव रोडवर श्री संस्थेने अतिशय अद्ययावत तसेच आधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असे एक लाख स्क्वेअर फुटाचे भव्य रुग्णालय उभारलेले आहे. येथे ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक उपचार पद्धती तसेच दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या माध्यमातून गरजू रूग्णांना सेवा दिली जाते. या रुग्णसेवेकरिता वरील आरोग्यपद्धतींशी संबंधित श्री संस्थेच्या समर्पित डॉक्टरांसह एकूण 76 तज्ञ मानसेवी डॉक्टर्स आणि वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय सेवा रुजू करतात. दररोज सरासरी 2,100 रूग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. आजपावेतो 1,81,28,354 गरजू रुग्णांनी या रुग्णसेवेचा लाभ घेतलेला आहे.

उपचार आणि सेवासुविधा
‘श्रीं’च्या आशिर्वादाने, श्री संस्थेद्वारे रूग्णसेवा हेच ईश्वरसेवेचे परमोच्च साधन मानून रूग्ण तसेच समाजासाठी विविध उपचारसुविधा समर्पित करण्यात आलेल्या आहेत. या वैद्यकीय सेवांद्वारे करूणा, समर्पण आणि सेवाभाव यांचा समन्वय साधण्यात आला आहे.
या रुग्णालयामध्ये खालील रोग-व्याधी-विकार यांवरील चिकित्सात्मक उपचार आणि सेवा-सुविधा अखंडीतपणे सुरू आहेत.
रुग्णालयाच्या माध्यमातून उपचार सुविधा घेण्याकरिता आलेल्या रुग्णांची नोंदणी पुढील प्रकारे केली जाते.
आयुर्वेदिक विभाग
अतिप्राचीन भारतीय आयुर्वेदीक उपचार पध्दतीचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे, या पद्धतीद्वारे रुग्णांना पारंपारीक वनौषधींचा लाभ घेता येतो. मार्च 2026 पर्यंत 28,69,448 रूग्णांनी आयुर्वेदीय उपचार पद्धतीचा लाभ घेतला आहे.
होमिओपॅथिक विभाग
या विभागाद्वारे होमिओपॅथीक उपचार पध्दतीच्या वैद्यकीय सेवेचा लाभ मार्च 2026 पर्यंत 47,04,741 रूग्णांनी घेतला आहे.
ऑलोपॅथी विभाग
विविध उपचार सुविधांनी सुसज्ज अशा या विभागात अन्य शहरांतून विशेष तज्ञ डॉक्टर्स रूग्णांच्या तपासणी करण्याकरीता श्री संस्थेला आपली सेवा विनामूल्य प्रदान करतात. मार्च 2026 पर्यंत 1,03,76,259 रूग्णांनी ॲलोपॅथी उपचार पद्धतीचा लाभ घेतला आहे.
रुग्ण नोंदणी विभाग
रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना नोंदणी करण्यासाठी प्रथम नोंदणी विभागात जावे लागते. येणाऱ्या रुग्णाची नोंदणी नवीन रूग्ण, जुने रूग्ण, सेवाधारी रूग्ण आणि मानसेवी रूग्ण अशा चार प्रकारांमध्ये केली जाते.
चौकशी कक्ष
चौकशी कक्षात आलेल्या रूग्णांना आवश्यक त्या रुग्णसेवांविषयी माहिती दिली जाते. डॉक्टरांचे दालन क्रमांक, विविध उपचारपद्धतींचे विभाग, विविध आरोग्य सेवांची माहिती रूग्णांना समजावून सांगितली जाते. मानसिक आरोग्य तज्ञांच्या भेटीची तारीख आणि वेळ रूग्णांना कळवून पुढील उपचारांसाठी योग्य ते मार्गदर्शनही केले जाते.
जनरल रुग्ण विभाग
रूग्णांकडून त्यांच्या व्याधीचे स्वरुप समजावून घेत संबंधित डॉक्टरांकडे तपासणीसाठी पाठविण्यात येते. या विभागातील डॉक्टर येणाऱ्या रुग्णांची तपासणी करुन, उपचार पद्धती निश्चित करुन त्याविषयी मार्गदर्शन करतात.
इंजेक्शन विभाग
येथे इंजेक्शन देण्यात येते. पुरुष रुग्णांसाठी पुरुष सेवक व महिला रुग्णांसाठी महिला सेवक सेवारत आहेत.
सलाईन नोंदणी विभाग
तज्ञ डॉक्टरांनी लिहून दिलेल्या आय.व्ही. फ्ल्युइडची नोंद येथे करण्यात येते आणि रुग्णाला सलाईन वॉर्डमध्ये पाठविले जाते.
पट्टीबंधन कक्ष विभाग
डॉक्टरांनी पाठविलेल्या रूग्णाच्या जखमेची स्थिती तपासली जाते. जखम स्वच्छ करून निर्जंतुकीकरण केले जाते. गरज पडल्यास टाकेही घातले जातात. रुग्णाची जखम पूर्ण भरून निघेपर्यंत येथे सेवा दिली जाते.
फिजिओथेरपी विभाग
या विभागात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली, विविध फिजिओथेरपी उपकरणांच्या साहाय्याने रुग्णांचे व्यायाम करून घेतले जातात. अपघातानंतर कवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णांचे अवयव पूर्वस्थितीत येण्याकरीता सातत्यपूर्ण व्यायाम आणि उपचार येथे करुन घेतले येतात. रूग्णाच्या पुनर्वसनाला येथे विशेष महत्त्व दिले जाते.
क्लिनिकल पॅथॉलॉजी विभाग
येथे रुग्णांचे रक्त व लघवीचे नमुने संकलित करून तज्ञ डॉक्टरांच्या निर्देशानुसार आवश्यक तपासण्या केल्या जातात. सीबीसी, हिमॅटोलॉजी, सिरोलॉजी, बायोकेमेस्ट्री, इम्युनोलॉजी, युरिनोलॉजी, मायक्रोस्कोपी तसेच विविध शारीरिक अवयवांच्या कार्यक्षमतेसंबंधीच्या तपासण्या करून त्याचे निदान केलेले रिपोर्ट रुग्णाला दिले जातात.
प्लास्टर विभाग
अस्थिरोग तज्ञांच्या मार्गदर्शनात, हाड तुटलेल्या दुखापतग्रस्त रुग्णांचे प्लास्टर (पीओपी) या विभागांतर्गत केले जाते. प्रशिक्षित तंत्रज्ञ व सेवक, डॉक्टरांच्या उपस्थितीत कापडी वा प्लास्टर बँडेजच्या साहाय्याने उपचार करतात. रुग्णांचे हाड पूर्णतः सांधेपर्यंत काळजी घेतली जाते.
एक्स-रे विभाग
येथे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांचे रेडिओग्राफी तंत्राने एक्सरे चित्रीकरण केले जाते. मशिनच्या साहाय्याने आवश्यक त्या भागाचे शूट घेऊन तयार झालेली एक्स-रे फिल्म (कॉपी) रूग्णाला दिली जाते.
दंत रोग चिकित्सा
या विभागात दातांशी संबंधीत वेदना, तोंडातील जखमा, गळवे, दंतक्षय, हिरड्यांचे विकार अशा विविध आजारांची तपासणी करुन औषधोपचार तसेच आवश्यक ते मार्गदर्शनही केले जाते.
दिव्यांग पुनर्वसन केंद्र
डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार व्यंगत्वग्रस्त रुग्णांच्या अवयवांचे मोजमाप घेऊन त्यांना आवश्यक ती साहाय्यक साधने उपलब्ध करून दिली जातात. या अंतर्गत जयपूर फूट, कॅलिपर्स, रिपेअरिग सेवा, कंबरेसाठी पट्टा, क्रेप बॅन्डेज, सर्विकल कॉलर, नी कॅप, रिस्ट बेल्ट, चेस्ट बेल्ट इत्यादी साहित्य उपलब्ध करून देण्यात येते.
दिव्यांग पुनर्वसन केंद्रात मार्च 2026 पर्यंत 4,27,777 रूग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.
श्री संस्थेने आयोजित केलेल्या विकलांग शिबिरात 2584 रूग्णांची तपासणी होवून 400 विकलांग रूग्णांवर उदयपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. 418 विकलांगांना ट्रायसिकल, व्हीलचेअर, कुबडी व कॅलिपर्स देण्यात आले. हा सर्व खर्च श्री संस्थेने केला. या सेवाकार्या-बद्दल महाराष्ट्र शासनाने स्मृतिचिन्ह देऊन श्री संस्थेचा गौरव केला.
श्री संस्थेने या सेवेअंतर्गत आता अद्ययावत दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू केले असून या केंद्रामध्ये विविध आकारातील जयपूर फूट तसेच कृत्रिम अवयव तयार करून वितरित केले जातात. आजपावेतो 8,258 जयपूर फूट, कॅलिपर्स वितरीत करण्यात आले.
नेत्रविकार चिकित्सा
श्री संस्थेने वेळोवेळी भव्य प्रमाणात नेत्र शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन केले आहे. या सेवाप्रकल्पाद्वारे आजपावेतो 13,642 रूग्णांना दृष्टीलाभ झालेला आहे. या शिबिरामध्ये आलेल्या रूग्णांच्या राहण्याची, जेवणाची व अल्पोपाहाराची व्यवस्था श्री संस्थेकडून विनामूल्य करण्यात आली तसेच रूग्णांना श्री संस्थेद्वारा चष्म्याचे वितरण देखील करण्यात आले. श्री संस्थेच्या या राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्याबद्दल सन 1982-83 व सन 1983-84 या वर्षासाठी श्री संस्थेला शासनाने प्रशस्तिपत्र प्रदान करून, श्री संस्थेचा गौरव केलेला आहे.
स्वागत कक्ष
या कक्षात रूग्णालयाला भेट देण्यास येणाऱ्या अतिथींची, तसेच रुग्णांना आरोग्यसेवा देण्यासाठी येणाऱ्या मानसेवी डॉक्टरांच्या चहा-पाणी तसेच अल्पोपाहाराची व्यवस्था केली जाते.
प्रसादालय कक्ष
या विभागामध्ये रूग्णालयांमध्ये सेवा देणारे डॉक्टर्स तसेच ग्रामिण आरोग्य केंद्रामध्ये येणारे रूग्ण आणि सेवकांची भोजनप्रसादाची व्यवस्था केली जाते.
चालक विश्रांती गृह
रूग्णालयात येणाऱ्या मान्यवरांच्या तसेच डॉक्टरांच्या वाहन चालकांसाठी येथे स्वतंत्र विश्रांतीगृहाची सोय करण्यात आली असून सोबतच पिण्याचे पाणी तसेच प्रसाधनगृहाची सोयही करण्यात आलेली आहे.
ग्रामीण आरोग्य सेवा योजना
उद्देश :
ग्रामीण भागातील कोरडवाहू शेतजमीनधारक शेतकरी कुटुंब तसेच दारीद्र्य रेषेखालील कार्डधारक, गरजू, आर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच असमर्थ रूग्णांना सुदृढ आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध आजारांच्या उपचारार्थ फक्त ऑपरेशनसाठी वैद्यकिय मदतीच्या स्वरुपात श्री संस्थेकडून यथाशक्ती आर्थिक साहाय्य करणे.
या सेवायोजने अंतर्गत ऑपरेशनकरीता बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील 1139 खेडेगांवातील 2,45,262 कुटुंबातील 12 लाखांहून अधिक गरजू व शेतकरी बांधव या योजनेचे लाभार्थी आहेत. मार्च 2026 पर्यंत 66,889 गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. यापैकी 52,271 रुग्णांचे विविध प्रकारचे ऑपरेशन करण्यात आले.
