श्री क्षेत्र गिरडा
स्थापना : भारतातील अनेक सिद्ध तपोभूमींप्रमाणे आध्यात्मिक तेजाने भारलेली श्री क्षेत्र गिरडा भूमी परमपूज्य श्री स्वयंप्रकाश महाराज यांच्या अखंड तपश्चर्येने पवित्र झालेली आहे. पूज्य बाबाजींनी या क्षेत्राचे नामाभिधान ‘श्रीक्षेत्र मोक्षाश्रम पांचझिरा’ असे केले.
श्रीज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात श्रीज्ञानेश्वर माऊलींनी साधनेकरिता उपयुक्त स्थळाचे जे सुंदर व समर्पक वर्णन केलेे आहे, त्या सर्व लक्षणांनी युक्त भूमी श्री क्षेत्र गिरडा येथे पाहावयास मिळते. येथे प्रसन्नचित्त शांती, आध्यात्मिक ऊर्जा तसेच साधकांना त्यांच्या अंतःकरणी एकाग्रतेचा अनुभव देणारे वातावरण प्राप्त होते.
समाधी मंदिर : श्रीकृपेने, श्री संस्थेद्वारे या पावन स्थळाचे ‘साधनास्थळ’ स्वरुपात संवर्धन करण्यात आले आहे. येथे परमपूज्य श्री स्वयंप्रकाश महाराज यांची संगमरवरी दगडी बांधणीतील समाधी असून श्री संस्थेने पांचझिरा श्रीउंबरेश्वर व श्री एकादश रूद्र मंंदिर परिसराचे नूतनीकरण केल्यामुळेे या स्थानाला तेजोमय स्वरूप प्राप्त झाले आहे.
गिरडा परिसरात श्री संस्थेचे 09 एकर शेत असलेल्या स्थळी श्री मच्छिंद्रनाथांचे मंदिर उभारले आहे.
नित्यक्रम आणि उत्सव : दरवर्षी श्री भिष्माष्टमी आणि परमपूज्य श्री स्वयंप्रकाश महाराज पुण्यतिथी उत्सवाचे प्रसंगी येथे हजारो भक्तजन महाप्रसादाचा लाभ घेतात.
सामाजिक सेवाकार्य : 70 एकर परिसरात वसलेली श्री क्षेत्र गिरडा ही तपोभूमी सदाहरित आणि पर्यावरणपूरक राहावी या करीता हजारो उपयुक्त वृक्षांची लागवड तसेच जलसंवर्धनाचे सेवाधर्मी कार्य श्री संस्थेच्या माध्यमातून येथे कार्यान्वित आहे.
